शिक्षणाचे (बिघडलेले) आरोग्य
शिक्षणाचं आरोग्य बिघडायला
मुख्य कारण घडलं ते “शिक्षण डॉक्टरांचं” चुकलेलं निदान आणि त्यावर दिलेला जालीम
डोस! हे वाचताना तुम्हाला त्रास होत असेल पण मी तुम्हाला (तुम्हालाच माहित
असलेल्या) चार प्राथमिक गोष्टी सांगतो.
गोष्ट एक. कोणे
एके काळी काही ‘शिडॉ’ (शिक्षण डॉक्टर) ना असा शोध लागला की,‘लहान मूल हा मातीचा
गोळा आहे. शिक्षक त्याला घडवतात आणि मगच त्याचे माणसात रुपांतर होते.” जणूकाही हे
वेदा मधीलंच अपौरुषेय वाक्य आहे असा समाजाचा ठाम समज झाला. हा (गैर) समज खूप खोलवर
रुजला मग चांगलाच फोफावला आणि इथेच मोठा लोचा झाला. घरात मातीचे गोळे जन्माला आले
की त्यांचं शिकण्यासाठी शिक्षक नावाच्या शिल्पकाराकडे आउटसोर्सींग केलं जायचं. हे महान
शिल्पकार हातात छिन्नी हातोडी घेऊन तयारीतच असत.
“उत्तम शिल्प
घडण्यासाठी त्या ‘गोळ्याने’ टाकीचे भक्कम घाव, हजारो फटके, अनंत यातना आणि
शिल्पकाराची बोलणी, दूषणं, लाथा हे सारं (आनंदाने व विनातक्रार) स्वीकारले पाहिजे”
असा ही एक उपसमज होता. (संदर्भासाठी वाचा, बिगरी ते म्याट्रीक, पु.ल.देशपांडे)
शिक्षकांनी मुलांना मारणे, झोडपणे, कुटणे, फटकावणे, बुकलणे, कानफटवणे, नवनवीन
युक्त्या वापरुन त्याला यातना देणे या मामुली गोष्टी समजल्या जायच्या. यासाठी
शिल्पकार शिक्षक पट्टी, छडी, डस्टर, झाडाचा फोक, काठी अशा शैक्षणिक साधनांची मदत
घेत. काहीवेळा या शैक्षणिक साधनांवर अवलंबून न राहता शिक्षक आपल्या बळकट हाता-पायांवर
विश्वास ठेवत.
अशाप्रकारे शिल्प घडायला सुरुवात झाली की ते शिक्षक “त्या
अनघड शिल्पांना” इतकं शिकवत-इतकं शिकवत की त्या (उच्च) शिक्षणानेच मुले गुदमरुन
जात. समजून न घेता सतत घोकंपट्टी केल्याने मुलांना शिक्षणाचे अपचन तरी होई नाहीतर
डिसेंट्री. आणि मग परीक्षेत पेपरात वर्षभराचा तुंबलेला कोठा साफ केला की मुले
पुढच्या वर्गात जात.
गोष्ट दोन. “ज्या
वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स आहे तो वर्ग चांगला” असे आणखी एक अपौरुषेय वाक्य रुजलं
होतं. ‘वर्गात पिन ड्रॉप सायलेन्स’ याचा अर्थ, शिक्षक भडाभडा आणि भसाभस शिकवत
आहेत. समोरील मुले मात्र ‘आमच्याच नशीबी हे का आले आहेत?’ याचा विचार करत चेहर्यावर
आदर ठेवून शांत बसली आहेत. वर्गातील सायलेन्स बीघडू नये म्हणून मुलांनी समोरील शिक्षक
जे सांगत आहेत ते फक्त ऐकायचं..बस्स.
गोष्ट तीन. “शिक्षकांना
प्रश्न विचारणे, तुम्ही शिकविलेले मला कळले नाही असे मुलाने म्हणणे” हा दखलपात्र
गुन्हा होता. मुलाने चुकून शिक्षकांना प्रश्न विचारलाच तर त्या प्रश्नाचे उत्तर मुलाला
त्याच्या गालावर, हातावर, पाठीवर किंवा पायावर चांगले सणसणीतपणे मिळत असे. पुढचे
दोन दिवस तरी या “उत्तराच्या खाणाखुणा” त्याच्या अंगावर वाचता येत असत. यासंदर्भात
“गप्प बस. चूप बस. उगाच प्रश्न विचारण्याचा आगाऊपणा करू नकोस. आला मोठा मला अक्कल
शिकवायला. उगाच का माझे काळ्याचे पांढरे झाले?” ही ब्रॅण्डेड वाक्ये मुलांना ऐकावी
लागत.
गोष्ट चवथी आणि
शेवटची. सर्व शिल्पकार शिक्षकांचा असा दृढ विश्वास होता की “त्यांना शिकविता येते.
ते शिकवतात म्हणूनच मुले घडतात.” आणि शिकवणे म्हणजेच पाठ्यपुस्तक पूर्ण करणे.
..................................................................................................
आता या वरील चार
गोष्टींवर मी काहीच भाष्य करत नाही.
विनोबांनी
त्यांच्या ‘शिक्षण विचार’ या पुस्तकात काय सांगितले आहे ते त्यांच्याच शब्दात फक्त
तुम्हाला सांगतो.
· एका शब्दाच्या शोधावरुन सर्व हिंदुस्थानच्या
मनोवृत्तीचे भान होते. आपल्या घटनेत ज्या चौदा भाषांचा उल्लेख आहे, त्या सर्व
भाषेत ‘शिकविणे’ यासाठी शब्द नाही. ‘शिकण्या’- साठीच शब्द आहे. शिकविणे म्हणजे शिकण्याला मदत करणे असा
कृत्रीम शब्द बनविला आहे. इंग्रजीत जसा ‘टीच’ (शिकविणे) शब्द आहे तसा आमच्या भाषेत
नाही. आम्ही शिकवतो,शिकवण्याला मदत करतो, पण ‘टीच’ करत नाही. इंग्रजीत एक शब्द
‘लर्न’ (शिकणे) आहे व दुसरा ‘टीच’ (शिकविणे) आहे. म्हणजे शिकणे ही स्वतंत्र क्रिया
असून शिकविणे ही हि स्वतंत्र क्रिया आहे. हा अध्यापकाचा अहंकार आहे. हा अहंकार
जोपर्यंत आम्ही राखू तोपर्यंत शिक्षणाचे तत्व आमच्या लक्षात येणार नाही. म्हणूण
पहिली गोष्ट आपण ही समजली पाहिजे की, दुनियेत अशिक्षित म्हणून कोणी नाही.
·
शिक्षक
आणि मुले दोघेंही एकमेकांच्या आचरणापासून शिकत असतात. दोघेही विद्यार्थीच आहेत. जे
दिले जात नाही ते शिक्षण. जे घेतले जाते, ज्याचा हिशोब ठेवला जाऊ शकतो किंवा
ज्याची काही नोंद ठेवली जाऊ शकते, ते शिक्षण नाही. शिक्षणाची मोजदाद करता येत
नाही. जीवनच शिक्षण आहे. कॅलरींचा खरा हिशोब कागदावर नव्हे तर शरीरावरच दिसून येतो.
जे अनुभवले, खाल्ले, पचले, रक्तात मुरले तेच शिक्षण.
· ज्या विषयची मला परीक्षा द्यावी लागली त्या
विषयांचे मला फारसे ज्ञान नाही. परंतु ज्यांची परीक्षी मी दिली नाही त्यांचे मला
चांगले ज्ञान आहे. म्हणून माझ्या अनुभवाने मी परीक्षेला काही किंमत देत नाही. पोट
साफ करण्याकरता रेचक घ्यावे तशा ह्या परीक्षा असतात. परीक्षा दिल्या की सर्व ज्ञान
साफ! म्हणून शिक्षण-शास्र्यांनी उभ्या केलेल्या या ढोंगात पडण्याची जरुरी नाही.
·
पुस्तकात
अक्षरे असतात. त्यामुळे पुस्तकांच्या संगतीने जीवन सार्थक करण्याची आशा व्यर्थ
आहे. “बोलाचीच कढी बोलाचाचि भात, जेवूनिया तृप्त कोण झाला?” हा सवाल मार्मिक आहे.
कवीने म्हंटल्याप्रमाणे बुकातली विहीर बुडवीत ही नाही आणि बुकातली होडी तारीतहि
नाही. ‘अश्व’ म्हणजे ‘घोडा’ असे कोशात लिहिलेले असते. मुलांना वाटते, ‘अश्व’
शब्दाचा अर्थ कोशात दिलेला आहे. पण ते खरे नव्हे. अश्व शब्दाचा अर्थ कोशाच्या
बाहेर तबेल्यात बांधून ठेवला आहे. तो कोशात मावणे शक्य नाही. ‘अश्व’ म्हणजे ‘घोडा’
हे कोशातले वाक्य इतकेच सांगते, “अश्व शब्दाचा तोच अर्थ आहे जो घोडा शब्दाचा अर्थ
आहे.” तो कोणता? तबेल्यात जाऊन पाहा. कोशात नुसता पर्यायी शब्द दिलेला असतो.
पुस्तकात अर्थ राहत नाही. अर्थ सृष्टीत राहतो. हे जेव्हा उमजेल तेव्हा खर्या
ज्ञानाची चव कळेल.
·
एका
प्राचीन वचनात असे सांगितले आहे की, प्रसंगी ज्याचा सल्ला आपण घेऊ शकू असा सर्वात
जवळचा माणूस म्हणजे गुरू. जीवनात कधी एखादी समस्या उद्भवली, कठीण प्रश् समोर उभा
राहिला, तर सल्ला कोणाचा घ्यावा? शास्त्रकारांनी सांगितले आहे की तटस्थ गुरुजनांचा
घ्यावा. आज आपली स्थिती काय आहे? दरवर्षी आपल्या हातात कमीतकमी पंचवीस-तीस
विद्यार्थी असतात. संपूर्ण नोकरी काळात या हिशोबाने हजारो विद्यार्थी आपल्या
हातातून पार होतात. आपण त्यांना शिक्षण दिले, संस्कार दिले यात शंका नाही. परंतु
त्यातले किती विद्यार्थी त्यांच्या जीवनातील समस्या घेऊन तुमचा सल्ला मागण्यासाठी
आले? ते आईचा सल्ला घेतात, वडिलांचा घेतात, पत्नीचा किंवा पतीचा सल्ला घेतात.
भावाचा, मित्राचा सल्ला घेतात; परंतु शिक्षकाला मात्र दूर ठेवतात. हा, शिक्षक
म्हणून आपला केव्हढा मोठा पराभव आहे! वास्तविक शिक्षकाचा सल्ला हा सर्वात श्रेष्ठ
सल्ला मानला गेला पाहिजे. परंतु आज ती स्थिती नाही. याचे कारण एकच आणि ते म्हणजे
आज शिक्षकाला सामान्य नोकरापेक्षा वेगळे स्थान नाही. आपण जर संकुचित राजकारणाच्या
वर उठाल आणि जागतिक राजकारणाचा अभ्यास कराल, तिकडे लक्ष द्याल तर आपला अधिकार
आपोआप वर उंचावेल. याचा परीणाम म्हणून ठिकठिकाणचे लोक आपला सल्ला घेण्यासाठी धावत
येतील.
· मला जर कोणी विचारले की, मुलांच्या
शिक्षणाचे तत्व काय? तर थोडक्यात मी सांगेन की, शिक्षण देणार्या शिक्षकांनी बाल
व्हायचे आणि शिक्षण घेणार्या बालकांनी मोठे व्हायचे. शिक्षक जर बाल होऊ शकत नसेल
तर तो शिक्षण देत नाही, आणि बाल जर मोठा होऊ शकत नसेल तर तो शिक्षण घेत नाही असे
समजले पाहिजे.
.............................................................................................
आता तुम्हीच ठरवा
की सध्या शिक्षक आपला मोठेपणा बाजूला ठेवून मुलांसोबत शिकत आहेत की शिक्षण ‘देत’
आहेत? एकंदर शिक्षण आजारी आहे की व्हेंटिलेटरवर आहे?
मला कळवाल. मी
‘तुमच्या’ शिक्षण-विचार पत्रांची वाट पाहतोय.
.............................................................................................
· राजीव तांबे.
rajcopper@gmail.com
No comments:
Post a Comment